अमरावती:खरपी गावात कोट्यावधीच्या विकास कामाचे लोकार्पण
अचलपुर संवाददाता सैयद गनी की विशेष रिपोर्ट
अचलपुर अमरावती महाराष्ट्र,
परतवाडा
अचलपूर तालुक्यातील खरपी गावात विकासाची गंगा वाहू लागली आहे. यासाठी खऱ्या अर्थाने आमदार बच्चू कडू यांची प्रेरणा आणि आर्थिक पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. येथील सरपंच योगेश भोसले आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांच्या प्रयत्नाने गाव विकासासाठी तब्बल २ कोटी ६२ लाख रुपये मिळाले. विकास कामांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते, बचत गट भवन, हनुमान मंदिर सभागृह, ख्रिश्चन सभागृह, पांधण रस्ते असे महत्त्वपूर्ण कामे त्यात समाविष्ट आहे. खरपी सारख्या छोट्याशा गावाला एवढा मोठा विकास निधी मिळाल्याने ग्रामवासी सुद्धा अचंबित आहे. या सर्व विकास कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी सह ग्रामस्थांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले. यावेळी मंचावर आमदार बच्चू कडू यांचे सह अचलपूरचे तहसीलदार डॉ. गरकल, गटविकास अधिकारी अरबट, ग्राम विस्तार अधिकारी कासदेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बिरादरे, सरपंच योगेश भोसले, उपसरपंच आरिफ खान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी ग्राम विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास दिला. येत्या दोन वर्षात मतदार संघातील प्रत्येक गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण करण्याचा संकल्प केला. प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी लवकरच देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. येत्या काळात गावातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्यावर आपला भर राहील असे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र जांभे, आकाश पाटोकार, सौ सोनल साळंके, रत्ना जांभे, रजनी गहरे, कु. प्रीती पाटोकर, फिरदोस यास्मिन, नासिर खान, दिनकरराव पवार, पोलीस पाटील संजय भगत, तंटामुक्ती अध्यक्ष सलीम खान, दिलीप आमडारे सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.